Friday, 22 July 2016

'माणदेशचा म्हादा'

मागील आठवड्यात काही मुलांचा फोन आला. एका हॉटेलमध्ये गेले असता त्यांच्या हातातील शिवबंधन बघून विरोधी विचाराच्या सासवडमधील कार्यकर्त्यांना भलताच चेव आला. मुलांना त्यांची मस्तीही अनुभवायला मिळाली. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर हा सगळा प्रकार त्यांनी मला कथन केला. मला त्यात विशेष काहीच वाटले नाही पण क्षणाचाही विलंब न लागता दोन व्यक्तिरेखा माझ्या डोळ्यासमोर नाचू लागल्या. 

    


          एक 'तो' जो मेंढरातुन आला... लोकसभेची निवडणुक लढत असताना प्रचार करून दमला की मिळेल त्याच्या घरी चटणी भाकरी खाऊन त्याच्याच पडवीला झोपायचा.. सकाळी उठुन कुणाच्याही विहिरीवर अंघोळ करून पुन्हा प्रचाराला लागायचा. तो निघून कधी गेला याचा पत्तासुद्धा त्या घर मालकाला लागत नसे. झपाटलेले पण प्रामाणिक कार्यकर्ते त्याच्यासाठी रात्रीचा दिवस करत होते. कपड्यांची बोचकी सोबत घेवुन घराबाहेर पडलेले कार्यकर्ते जीवाचं रान करून आपल्या नेत्यासाठी लढत होते. दशरथ राउत नावाचा एक अवलिया घरोघर जावुन झोळी पसरायचा आणि मिळेल त्या पैशात प्रचारमोहीम चालवायचा. नेता मैदानात लढत होता तर कार्यकर्ते जीवाला घोर लागल्यासारखे धावत पळत होते. एक एक कार्यकर्ता म्हणजे कोकणातल्या फणसासारखा... पवारांवर दात ओठ खाताना काटेरी भासायचा पण स्वतःच्या नेत्याविषयी त्याची कणव पाहिली की फणसातल्या गराप्रमाणे वाटायचा.  पवारांवरील त्यांची नाराजी तात्विक पण तितकीच विधायकही होती... फालतुपणाचा लवलेशही कुठे दिसणार नाही असा सगळा मामला होता. भाषणातुन आपला समाज कसा बदलेल आणि आधुनिकतेकड़े वळेल याचीच तळमळ ... कृतीही तशीच... साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे जिवंत उदाहरण या नेत्याच्या रुपात दिसले. लोकसभेच्या निमित्ताने त्यांचे हे पैलू अनुभवता आले.                                                                
                                            ...............

दुसरा नेता 'तो' होता ज्याच्या दोन पिढ्या लढ़ल्या, पडल्या... पण शिकल्या काहीच नाहीत. ज्यांच्या जीवावर राजकारणाचा सारीपाट मांडायचा ते कार्यकर्ते म्हणजे सर्वसामान्यांसाठी उभारलेल्या छळछावण्या... नेत्याने तरुणांना दिशा द्यायची तर नेताच त्यांच्या मागे उभा राहून नको त्या कामांसाठी पाठबळ देऊन मोकळा...  गुंडागर्दी करा, गोरगरिबांना देशोधडीस लावा, लुटा, सगळं करा ... विषय गंभीर पण नेता खंबीर.                                                               

                                           .................       

एकीकडे नेता आपल्या समाजाला पारंपारीक मेंढ़पाळीतुन बाहेर काढुन स्पर्धात्मक जग दाखवतोय, वेगळा विचार करायला भाग पाडतोय तर दूसरीकडे नेत्याला स्वतःच्या राजकारणापलिकडे डोकावण्याची गरजच वाटत नाहीये. नेत्याने आपल्या कवडी मोल राजकारणासाठी त्यांच्या मागे आपल्या पैशांची ताकद उभी केलीये ज्यातुन माणुसकी लयाला गेलीये आणि तिची जागा क्रौर्यानी घेतली आहे.       एका बाजुला माणुसकीचा लढा आहे तर दुसऱ्या बाजुला माणुसकीचा गळा घोटणारी संवेदनहीनता.       माणुसकीसाठी लढ़णारा “माणदेशचा म्हादा” जनता जनार्दनाकडेच पैशासाठी झोळी पसरून मंत्री झाला. अनीतीने लढ़णारा एक नेता जनता जनार्दनासमोर पोती रिकामी करून हरत राहिला. आपली लोकशाही प्रगल्भ झाली म्हणायचं काय ???

(“माणदेशचा म्हादा” हा शब्दप्रयोग आदरार्थी आहे. उगीच गैरसमज नको.)